कुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील वसुंधरा विज्ञान केंद्रातर्फे १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत ५२वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
विज्ञान केंद्रामार्फत गेली २२ वर्षे ग्रामीण भागातील जनतेचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न केला जात असून, हे वार्षिक विज्ञान अधिवेशन विद्यार्थी, शिक्षक आणि सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी प्रेरणादायी व बोधप्रद ठरावी, हा या मागचा उद्देश आहे.
शनिवारी (ता. १६) सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत नोंदणी केली जाणार असून १०.३० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यानंतर मनमोहन शर्मा संशोधन पुरस्कार आणि उत्तम विभाग पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून, वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि चिपळूण (रत्नागिरी) येथील पक्षिमित्र भाऊ काटधरे यांचा सत्कार केला जाणार आहे. यानंतर ब्रेल पुस्तिका आणि वामन पंडित यांच्या वनस्पतीशात्रज्ञांची ओळख या पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. उल्हास राणे यांचे अध्यक्षीय भाषण होईल.
दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत सागरी परिसंस्था या विषयावर परिसंवाद होतील. यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे ‘सागरी परिसंस्था’, राष्ट्रीय सागर संशोधन संस्थेचे उपसंचालक डॉ. बबन इंगोले ‘सागरी प्रदूषण व जैविक संपदा’, संशोधक मयुरेश गांगल ‘सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसाय’, गोदरेज अँड बॉईस मॅन्यु. कं. लि.चे व्यवस्थापक आणि कांदळवन संवर्धन विभागाचे लक्ष्मीकांत देशपांडे ‘कांदळवनातील परिसंस्था’, भाऊ काटधरे ‘कासव संवर्धन’, रामदास कोकरे ‘शून्यकचरा व्यवस्थापन’, संजीव कर्पे ‘बांबू संशोधन’, अॅड. असीम सरोदे ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरण’ यावर मार्गदर्शन करतील. रात्री कळसुत्र्या बाहुल्या आणि दशावतार हे स्थानिक कार्यक्रम होतील.
रविवारी (ता. १७) सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘शाश्वत शेती - समस्या व उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात दापोली (रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे (पुणे) संजय पाटील, अभिनव फार्मर्स क्लबचे डॉ. ज्ञानेश्वर बोडके, विलास गायकवाड वेगवेगळ्या विषयांवर मार्ग्सार्षण करतील.
दुपारी ११.३० ते १.३० या वेळेत मुख्य मंडपातील कार्यक्रमात सागरशास्त्र संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी, डॉ. कणकवली कॉलेजचे बाळकृष्ण गावडे, संशोधक मिलिंद पाटील, मालवण येथील स्यमंतकचे मोहम्मद शेख हे सिंधुदुर्गातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अनुभव कथन करतील. यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगातून विज्ञान या विषयांतर्गत सातारा येथील विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या गीता महाशब्दे, पुणे येथील सेंटर फॉर सायन्स सिम्युलेशन अँड मॉडेलिंगचे डॉ. दिलीप कान्हेरे हे मार्गदर्शन करतील.
दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. याचवेळी २.३० ते ४.३० या वेळेत महिला सक्षमीकरण हा समांतर कार्यक्रम होईल. यात पुणे येथील समुचित एनन्व्हायरो टेकच्या डॉ. प्रियदर्शनी कर्वे, लेखिका डॉ. वर्षा जोशी या सहभागी होतील. दुपारी 3.३० ते ५.३० या वेळेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक डॉ. आयझॅक किहीमकर, वन्यजीव वनस्पतीशास्त्र अभ्यासक बिभास आमोणकर आणि पार्थ बापट हे सहभागी होणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचा समारोप होईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत ‘धामापूर विज्ञानवारी’ ही वैज्ञानिक सहल निघेल.
अधिवेशनाविषयी :कालावधी : १६, १७, १८ डिसेंबर २०१७
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : वसुंधरा विज्ञान केंद्र, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
संपर्कासाठी : दूरध्वनी : ७५२२९ ३१३५९, ८२७५७ ७१३६९
ई-मेल : eduvasundhara@gmail.com
अधिवेशन नोंदणीसाठी : www.vasundharasow.org